नागपूर: नागपूर मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची गरज लक्षात घेत याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. हे बदल ६ जून (सोमवार) पासून लागू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत खापरी, लोकमान्य नगर, कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज येथून सुटणाऱ्या गाड्यांना हे बदल लागू झालेले आहेत .
या नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवाश्यांची अतिशय गर्दीची वेळ बघता त्या वेळेवर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. उन्हाळ्यामुळे आणि गेले काही दिवस वाढलेल्या उकाड्याने प्रवासी तापमान कमी झाले की बाहेर पडतात आणि मेट्रोने प्रवास करतात हे निदर्शनास आले आहे. म्हणूनच सायंकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत प्रवासी संख्या जास्त असल्याने या याकाळात १५ ऐवजी दर १२ मिनिटांनी मेट्रो सेवा असेल. सर्वसाधारणपणे हि वेळ कार्यालयातून परत येण्याची असल्याने देखील या दरम्यान गाड्यांमध्ये गर्दी जास्त असते.
तसेच सकाळी ८ ते १०.३०, दुपारी ३.३० ते ५ आणि सायंकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान मेट्रो सेवा दर १५ मिनिटांनी असेल. या खेरीज इतर वेळेवर सुटणाऱ्या प्रत्येक मेट्रो गाडीमध्ये २० मिनिटाचे अंतर असेल. या आधी दिलेल्या माहिती प्रमाणे सकाळी ६.३० वाजता पहिली तर रात्रौ १० वाजता शेवटची मेट्रो फेरी वरती उल्लेखित केलेल्या चारही मेट्रो स्टेशन वरून असेल. मेट्रोने प्रवास करताना लागू होणाऱ्या वेळापत्रकाची माहिती प्रवाश्यांनी ठेवावी असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येतं आहे.