नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाद्वारे शहरातून माती/तांदूळ संकलनाला सुरुवात झाली आहे. शहरात दहाही झोनस्तरावर प्रत्येक प्रभागामध्ये घराघरांतून माती/तांदूळ संकलीत करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. शहरातील प्रमुख स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून देखील माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येत आहे.
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत मनपाच्या दहाही झोन कार्यालयांद्वारे हर्षोल्लासात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जाईल. ही यात्रा झोनमधील प्रत्येक प्रभागांमध्ये जाउन घराघरांमधून नागरिकांकडून माती किंवा तांदूळ संकलीत करेल. संकलीत झालेले माती किंवा तांदळाचे कलश नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये सन्मानपूर्वक हर्षोल्लासात आणले जातील. मनपा मुख्यालयातून दहाही झोनमधील कलश एकत्र करून संपूर्ण नागपूर शहराचे ते कलश राज्याची राजधानी मुंबई येथे पाठविण्यात येतील. मुंबई येथून संपूर्ण राज्याचे कलश देशाची राजधानी दिल्ली येथे राजपथवर पाठविली जाईल.
या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, त्यांच्या परिसरामध्ये येणा-या अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी होउन माती/तांदूळ संकलीत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.