– नवविवाहितामध्ये उत्साहाचे वातावरण.
वाडी ( अंबाझरी ):- वट पौर्णिमा म्हणजे महिलांसाठी त्याग भावना जागृत करण्याची एक आनंदमयी पर्वणीच असते.पुराण कथांमध्ये ‘जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा”यासाठी वटवृक्षाची पूजा अर्चना करून साकडे घालतात. सावित्रीने सुद्धा मृत्युदिनाच्या तीन दिवसापूर्वी पासून अन्नपाणी त्यागून पतिव्रत धारण केले,शेवटी सत्यवानाला दीर्घायुष्य मिळाले.याच पुराण कथेचा आधार घेऊन आजतागायत महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करून आपल्या सौभाग्याचे आयुष्य वाढावे म्हणून साकडे घालत असतात.मिळू दे सात जन्माची साथ अशी प्रार्थना करतात. काही याला अंधश्रद्धा म्हणतात तीर काही विज्ञाननिष्ठा . पौराणिक कथा ची वैज्ञानिक दृष्टीशी सांगळ घातली तर अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यांची उत्तरे ही मिळतात .
असाच पहिला प्रश्न पडतो की या दिवशी वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही?
हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही! तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता येईल?
जगात सर्वात दाट सावली असते वडाची वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या तीन नी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड. ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेल्या सत्यवानाला ऊन लागून मुर्छा आली . गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे.ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
मग याचा सात जन्मांशी संबंध काय? ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट .सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे.जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.नवा देह.
असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.
शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’ म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा करायची व वृक्ष संगोपन करणे हिच काळाची गरज आहे . .