नागपूर :- या देशात राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त 6 राष्ट्रीय पक्ष असून निवडणूक आयोगाच्या निकषानुसार भाजपा, काँग्रेस नंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टी (BSP) आहे. काँग्रेस ही गांधींच्या विचारावर चालते, भाजपा ही गोळवलकर व मनूच्या विचारावर चालते. तर बसपा ही फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालते.
बसपाचा जनाधार हा संपूर्ण भारतातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक असा 85% बहुजन समाज असून, हल्ली बसपाकडे 15 खासदार व 2 कोटीवर मतदान आहे. बसपाची स्थापना 14 एप्रिल 1984 रोजी कांशीरामजी यांनी केल्यावर अवघ्या 13 वर्षात (2 जून 1995) भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये मायावतीच्या माध्यमातून एक दलित समाजातील प्रथम महिला मुख्यमंत्री बनली. त्यानंतर लगेच दोन वर्षात 25 नोव्हेंबर 1997 ला बसपाला मतांच्या भरोशावर अवघ्या 13 वर्षात राष्ट्रीय राजकीय दर्जा प्राप्त झाला जो अजूनही कायम आहे.
नागपूर विद्यापीठाने 2023-24 च्या एम ए इतिहासाच्या अभ्यासक्रमात काँग्रेस व भाजपालाच सामील करून व बसपाला नाकारून त्यांनी आपले खरे जातीयवादी व मनुवादी रूप दाखविले असा आरोप बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी करून बसपाला एम ए च्या इतिहासात स्थान मिळावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
नागपूर विद्यापीठात बामसेफ, बसपा व कांशीराम ह्यांच्यावर अनेकांनी पीएच डी केल्या. बसपाची मदर ऑर्गनायझेशन म्हणून कांशीरामजींनी बामसेफच्या माध्यमातून कार्याची सुरुवात केली. बामसेफ, बीएसपी व कांशीराम यावर डॉ पी एस चंगोले, डॉ सुशांत चिमणकर, डॉ यशवंत मेश्राम, डॉ कमलाकर तागडे, डॉ महेंद्र गायकवाड, डॉ अशोक जाधव, डॉ किशोर चौरे ह्यांनी पीएचडी केलेल्या असून नागपूर विद्यापीठाने त्यांना अवार्ड सुद्धा केलेल्या आहेत. मी सुद्धा हल्ली याच विषयावर पीएचडी करतो आहे. नागपूर विद्यापीठाने बसपाला इतिहासाच्या अभ्यासक्रमातून कुणाच्या इशाऱ्यावर नाकारले हे कोडे अजूनही उलगडले नाही.
या पक्षाचा जाहीरनामा म्हणजे भारताचे संविधान होय. या पक्षाचे वैशिष्ट्य असे की कांशीराम नावाच्या एका व्यक्तीने ज्याला काहीही राजकीय बॅकग्राऊंड नव्हते त्या एकट्याने हा पक्ष उभा करून त्याला राष्ट्रीय स्तर प्राप्त करून दिले. या पक्षाने उत्तर प्रदेशात मायावतींच्या माध्यमातून चारदा नेतृत्व केले. या पक्षानेच एका मताने (बसपा चे तीन खासदार) केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी चे तेरा महिन्याचे सरकार पाडले होते. भाजपच्या संविधान समीक्षा आयोगाच्या विरोधात, संविधान समर्थनार्थ बसपा ने देशभर संविधान समर्थन रॅलींचे आयोजन केले होते.
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मायावतींचे शासन भारतभर प्रसिद्ध आहे.
दलित,आदिवासी, मागास वर्गीयांच्या नेतृत्वातील पक्ष हा राष्ट्रीय होऊ शकतो व तो राष्ट्रीय राजनीति करू शकतो हेच प्रस्थापितांना, जातीय वाद्यांना पचत नाही. म्हणूनच बसपाला इतिहासाच्या अभ्यासक्रमातून बाहेर करणारे मनुवादी षडयंत्र रचल्या गेले. अभ्यास मंडळाने, कुलगुरुने, राज्यपालाने, विद्यापीठ अनुदान आयोगाने, राष्ट्रपतीने याकडे विशेष लक्ष द्यावे.