![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- विविध आयुधांचा वापर करत विधिमंडळ सदस्यांनी विधिमंडळात सामाजिक, सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडावेत. प्रश्न मांडताना विशेष काळजी घ्यावी. योग्य वेळी योग्य विषय मांडल्यास त्या विषयाला उचित न्याय मिळवून देता येतो. यासाठी विधिमंडळ सदस्यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधान मंडळात प्रश्न मांडावेत, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विविध संसदीय आयुधे’ या विषयावर विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन करताना केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
विधान भवन येथे सदस्यांना ‘विविध संसदीय आयुधे’ या विषयावरील मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. याप्रसंगी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या समवेत विधिमंडळाचे सचिव (२) विलास आठवले, सचिव ऋतुराज कुडतरकर उपस्थित होते.
यावेळी विधिमंडळ सदस्य डॉ. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबाले, आणि किरण सरनाईक उपस्थित होते.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, विविध आयुधांचा वापर करून विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे सदस्यांची राज्यभर प्रतिमा निर्माण होत असते. विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे होणारा परिणाम यासह या प्रश्नांची व्याप्ती याबाबतचा सखोल अभ्यास विधिमंडळ सदस्यास असावा. या बरोबरच महत्वाच्या घडामोडी, घटनांकडे सभागृहाचे लक्ष त्याला वेधता यावे.
विधिमंडळ सचिव आठवले व कुडतरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख, ठराव, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, अल्पकालीन चर्चा, विधान परिषद सदस्य विशेष अधिकार, शासकीय विधेयक व अशासकीय विधेयक, राज्यपाल अभिभाषण, अर्थसंकल्पावर चर्चा या विषयांवर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तारांकित प्रश्नात कोणत्या स्वरूपाचे प्रश्न मांडावेत. तसेच ठरावामध्ये कोणत्या धोरणात्मक बाबी मांडल्या जाव्यात, प्रश्नांच्या उत्तरासाठी पाठपुरावा कशा पद्धतीने करावा याबाबतही आठवले व कुडतरकर यांनी सदस्यांना माहिती दिली.