– विसर्जन मिरवणुकीत स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा
– व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी आता मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.
शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. उत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असुन १० दिवसीय सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.१० व्या दिवशी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक शहरातील मुख्य रस्त्यांवर असतात. भाविकांसाठी विविध संस्था अथवा व्यक्तींद्वारे पाणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येतात. ही बाब चांगली असली तरी स्टॉल्स धारकांनी स्वच्छेतेचे भान राखण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे मनपा प्रशासनातर्फे विसर्जन मिरवणूकीत जे स्टॉल्स लावणार आहेत त्यांना डस्टबिन सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यावर भाविकांनी रिकाम्या प्लेट्स या डस्टबिन मधेच टाकाव्या याची काळजी स्टॉल्सधारकांनी घायची आहे. कारण जर या कागदी प्लेट्स रस्त्यावर फेकल्या गेल्या तर नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे या प्लेट्सवर सातत्याने पाय पडुन त्या रस्त्यावर घट्ट चिकटतात शिवाय दुर्गंधीही पसरते. या प्लेट्स मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना ब्लिचिंग पावडरद्वारे अथक प्रयत्न करून काढाव्या लागतात. हे लक्षात घेता गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांसाठी डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले असुन ज्या स्टॉल्स जवळ अस्वचता आढळेल त्यांचे चित्रीकरण करून त्यावर उचित कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन हे पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांची परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. मनपातर्फे शहरात २५ कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आले असुन दाताळा रोडवरही विसर्जन कुंड उपलब्ध आहेत. तेव्हा इरई नदीजवळील मोठ्या विसर्जन कुंडाचा वापर न करता छोट्या कुंडांचा वापर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.