नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात जवळपास 50 हजार अनुयायांना धम्मदीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यादिनाचे औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्म दीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा सोहळा होऊ शकला नाही. यंदा कोरोनामुक्त वातावरण आणि कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका, धम्म बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येणार आहेत. यातील बहुतांश बांधव सोहळ्यासह धम्म दीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भिक्खु संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थित दीक्षा सोहळा होईल. नोंदणी केल्यानंतर दीक्षा देण्यात येणार आहे. धम्म दीक्षा घेणार्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना दीक्षा दिली होती. त्या पवित्र भूमीवर येण्याची अनेकांची इच्छा असते. देश-विदेशातील अनुयायी येथून विचारांची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात आणि प्रगतीचे शिखर गाठतात. बाबासाहेबांचा वारसा चालविण्यासाठी भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित करीत आहेत. कोरोना काळातही बेझनबाग मैदानावर धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेतला होता.