आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

– मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी 

-पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९१ टक्के जणांना, तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.

परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायचा त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणकीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसित केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाइन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाइन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.

१६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी १०० जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, ३५ जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, १५ जणांना तृतीय पसंती क्रमानुसार, तर १६ जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.

या बैठकी दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण करावे - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Thu Oct 19 , 2023
मुंबई :- राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे मोठ्या प्रमाणात आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी. याबाबतची परिपूर्ण माहिती ग्रामपंचायत तसेच राज्यस्तरावर तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच कुटुंब व सार्वजनिकस्तरावरील कचरा संकलित करुन त्याचे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण व मूल्यमापन करण्याबाबत स्वतंत्र कार्यपध्दती विकसित करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com