Ø मुख्यमंत्री ‘योजनादूत’ निवड प्रक्रियेस प्रारंभ
Ø गावातच मिळेल शासकीय योजनांची माहिती
Ø योजनादूतासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
यवतमाळ :- शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 444 दूत नेमले जाणार असून त्याची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. या दूतास सहा महिने कालावधीपर्यंत प्रतिमाह 10 हजार मानधन दिले जाणार आहे. यासाठी ईच्छूक युवक दि.13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. योजनादूत म्हणून काम करण्यास इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर दि.13 सप्टेंबपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत स्मार्ट मोबाईल आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
योजनादूतासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला. उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये एक तसेच शहरी भागात प्रती 5 हजार लोकसंख्येमागे एक याप्रमाणे एकून 1 हजार 444 योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे.