नागपूर :- दक्षिण व दक्षिण पश्चिम नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकात एका मोठ्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून त्या रुग्णालयात जाण्या येण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा फायर च्या गाडीला त्रास होऊ नये म्हणून चौकातील 35 वर्षाचे बोधिवृक्ष (पिंपळ) तोडण्याची जाहीर परवानगी मागण्यात आली होती त्यावर बसपा नेते उत्तम शेवडे व अन्य तीन लोकांनी लिखित आक्षेप घेतले आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षी 1991 ला जोगीनगर येथील मिडल रिंगरोड चे कार्य सुरू झाले. त्यातील रोड पीडितांचे पुनर्वसन करून तिथे शताब्दी नगर व डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौक निर्माण करण्यात आला. या वसाहतीत बहुतेक बौद्ध समाजाची मंडळी असल्याने त्यांनी 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या व बुद्धाचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या बोधीवृक्षांचे रोपण व जतन केले. त्यामुळे मुख्य चौक व परिसरात अनेक डौलदार बोधिवृक्ष उभे झालेत.
मागील 30-35 वर्षात या वृक्षामुळे कोणत्याही वाहनांना अडथळा निर्माण झाला नाही. अलीकडे तीन-चार वर्षात खुल्या वादग्रस्त जागेवर एका हॉस्पिटलची निर्मिती होत असून त्या हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सला जाण्या येण्यासाठी त्रास होणार असल्याचे दाखवून हॉस्पिटलचे संचालक प्रा बबन तायवाडे यांनी नॅशनल संदेश व दैनिक महासागर या वृत्तपत्रात मनपाच्या माध्यमातून 28 जुलै ला जाहिरात देऊन त्या 35 वर्षाच्या बोधिवृक्षाला तोडण्याची परवानगी मागितली होती.
त्या जाहिरातीवर बहुजन समाज पार्टीचे मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, भारतीय दलित पॅंथरचे प्रकाश बनसोड, माजी नगरसेवक व ऑनलाईन आरएसएस चे संस्थापक अध्यक्ष जनार्दन मून तसेच माजी नगरसेविका नंदा झोडापे, त्यांचे पती सुनील झोडापे व परिसरातील नागरिकांनी बोधिवृक्षाचे झाड तोडण्यावर लेखी आक्षेप घेतले आहेत. झाडे लावा झाडे जगवा ही शासनाची मोहीम असताना विनाकारण झाडे तोडा ही मोहीम कधीपासून सुरू केली असाही प्रश्न तक्रार कर्त्यांनी विचारला आहे.
सुनावणी पुढे ढकलली
आज 23 ऑगस्ट रोजी या विषयावर सुनावणी होती. अर्जदार-तक्रारकर्ते हजरही झाले. परंतु उद्यान अधीक्षक चौरपगार यांना अचानक आलेल्या कामामुळे त्यांनी ती सुनावणी सोमवार पर्यंत पुढे ढकलली.