मुंबई :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत ५३,४२९ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यात आला आहे. छाननीमध्ये नाकारल्या गेलेल्या सुमारे ४९,९९९ विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरही फेरछाननी करून परीक्षा शुल्क माफीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता, त्यास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी माहिती दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, दुष्काळ घोषित झाल्यानंतर एकूण १२ प्रकारच्या सवलतीं देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा समावेश आहे. मात्र, बऱ्याच वेळा हे फॉर्म विविध कारणांमुळे नाकारले जातात. यात विद्यार्थ्यांच्या क्षेत्राचा दुष्काळग्रस्त महसूल मंडळामध्ये समावेश नसणे, हे प्रमुख कारण असते. जे विद्यार्थी रिपीटर असतात, त्यांचे फॉर्म तसेच नाकारले जाण्याची शक्यता असते. याशिवाय, काही विद्यार्थी इतर शासकीय सुविधांचा लाभ घेत असल्यास, त्यांचे अर्जही रद्द होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.