मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही! – चंद्रपुरातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

चंद्रपूर :- गेल्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशासमोर केवळ समस्यांचा डोंगर उभा केला असून गेल्या दहा वर्षांत या प्रत्येक समस्येवर शाश्वत स्वरूपाचा तोडगा काढून मोदी सरकारने देशाला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्य नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पहिल्या जाहीर प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. समस्या सोडविणे हे कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी असते, पण काँग्रेसने मात्र समस्या निर्माण केल्या, असा आरोप करून मोदी यांनी आजच्या सभेत काँग्रेसवर टीकेची झोड उठविली.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या संयुक्त प्रचारसभेतून मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उमेदवार सुधीर मुनगंटीवार व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या विराट ऐतिहासिक सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या गैरकारभाराची लक्तरे चंद्रपूरच्या वेशीवर टांगली. इंडी आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या पक्षांनी केवळ कट, कमिशन आणि मलई यांच्या हिशेबातून देशाला देशोधडीला लावले, असा थेट आरोप करत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या कारभारावरही कोरडे ओढले. या स्वार्थी आघाडीने कुटुंबाचा व स्वतःचा विकास साधण्यासाठी राज्यातील विकास प्रकल्पांना खोडा घातला, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची सतत उपेक्षा झाली,असा आरोप त्यांनी केला.

”सत्ता पाओ और मलई खाओ” हेच इंडी आघाडीचे धोरण होते, त्यातूनच महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्प त्यांनी रोखून धरले. महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना गुंडाळली, बळीराजा जलसंजीवनी योजनेला टाळे लावले, समृद्धी महामार्गाच्या कामात खोडा घातला, मुंबई मेट्रोचे काम रोखले, मराठवाडा वॉटरग्रीड योजना रखडविली, पंतप्रधान आवास योजनेतून गरीबांकरिता द्यावयाच्या घरांच्या योजनेत देखील अडसर निर्माण करून गरीबांना घरांपासून वंचित ठेवले. महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकार सत्तेवर येताच या योजना पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात आल्या असून आता विकासाचा मार्ग विस्तृत झाला आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. नक्षलवादाच्या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा आज विकासाचे मॉडेल ठरला आहे, असे ते म्हणाले, तेव्हा मोदी यांच्या विजयघोषाने चंद्रपूर दुमदुमून गेले.

लोकसभेची आगामी निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील लढाई आहे. एकीकडे मोदी सरकारचा विकासाचा संकल्प तर दुसरीकडे इंडी आघाडीचे विभाजनवादी, लांगूलचालनवादी राजकारण, यांच्यातील ही लढाई असून आता देशाने मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्य नसल्याने मोदी यांचा विजय निश्चित आहे. चंद्रपूरची ही विराट सभा या विजयाची ग्वाही देत आहे, असा विश्वासपूर्ण दावा पंतप्रधानांनी केला, आणि मोदी यांच्या नावाचा गजर सभास्थानी उमटला. या जल्लोषातच मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची आणि जनहिताच्या योजनांची माहिती दिली. ज्या कोट्यवधी भारतीयांकडे घरे नव्हती, त्यापैकी बहुसंख्य जनता गरीब, दलित, वंचित समाजातील होती. काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रत्येक समस्येचे सर्वाधिक चटके या वर्गालाच बसले, पण या वर्गाचे जीवनमान बदलण्याची गॅरंटी मोदी यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेतून वितरित झालेल्या चार कोटी घरांपैकी सर्वाधिक घरे याच वर्गातील जनतेस मिळाली. मोफत सिलिंडर योजना, पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार, किसान सन्मान योजना, अशा योजनांमुळे या वर्गाच्या जगण्यात क्रांतिकारी बदल झाला असून या देशातील जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे मोदी हे परिवर्तन घडवू शकले, अशा नम्र शब्दांत त्यांनी जनतेचे आभारही मानले.

स्वातंत्र्य मिळताच देश तोडण्यापासून, काश्मीरमधील दहशतवादाला काँग्रेसनेच खतपाणी घातले. प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारण्यापासून राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणणारी, श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास विरोध करणारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणारी काँग्रेसच होती. आता तर जाहीरनाम्या द्वारे विभाजनवादी भाषा बोलणारीही काँग्रेसच आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व इंडी आघाडीवर जोरदार प्रहार केले. दहशतवादाने काश्मीर जळत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर नकली शिवसेना मात्र दहशतवादास खतपाणी घालणाऱ्यांच्या वळचणीस गेली आहे, अशी टीका करून मोदी यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. भाजपाच्या प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आणि जनतेनेही, घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या मजबूत पुनरागमनासाठी प्रयत्न करावेत आणि प्रत्येक घरात मोदी यांचा नमस्कार पोहोचवावेत, असे आवाहनही अखेरीस मोदी यांनी केले.

काँग्रेस म्हणजे ‘कडू कारले’!

आपल्या भाषणाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील मराठीजनांच्या मनाला साद घालणाऱ्या पंतप्रधानांनी भाषणाच्या अखेरीस एक चपखल मराठी म्हण वापरून काँग्रेसी संस्कृतीचा शेलका समाचार घेतला. “कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच”… अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसला शाब्दिक चिमटा काढला. प्रचंड जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून त्यास सहमती दर्शविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशाच्या प्रगतीमध्ये गडकरींचे मोठे योगदान - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Tue Apr 9 , 2024
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ पश्चिम नागपुरात सभा नागपूर :- नितीन गडकरी यांनी नागपूरसह संपूर्ण देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत भारताची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. आज देशाने गेल्या दहा वर्षांमध्ये जी प्रगती केली आहे, त्यात नितीन गडकरी यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ना. योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!