चंद्रपूर :- मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांनी कारवाई केली असुन 51 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, विहित मुदतीत जर कराचा भरणा झाला नाही तर या मालमत्ताचा लिलाव केला जाणार आहे.
यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांवर असलेली थकबाकी ही जप्त केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मनपाला जमा करावी लागते, अन्यथा त्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा अधिकार मनपाला आहे.
15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.