![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
चंद्रपूर :- शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ गुंठेवारी प्रकरणातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
चंद्रपूर शहरातील जी गुंठेवारी प्रकरणे आहेत त्यात बहुतांश व्यवहार हे नोटरीद्वारे केले गेले आहेत. ज्या नागरिकांनी गुंठेवारी प्रकरणात नोटरीद्वारे व्यवहार केलेले आहेत त्यांना नियमित करण्याची संधी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेद्वारे मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजपत्रात अधिसूचित केलेल्या ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन आदेशाच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाने ११ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून या योजनेबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना जारी केल्या आहेत.
१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या सालामध्ये निष्पादित केलेल्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणात कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सुट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे.
तसेच १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये निष्पादित केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट आणि दंड हा नाममात्र २५ लाख ते १ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्क्म त्यापेक्षा जास्त असल्यास ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.
मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रक्कमेच्या मुद्रांक पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही.
यासंबंधी आढावा बैठक मनपा कार्यालयात १२ जानेवारी रोजी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदुळे,भूमि अभिलेख उपअधिक्षक मिलिंद राऊत,सहायक दुय्यम निबंधक बीएन माहोरे,नरेंद्र बोके सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते उपस्थित होते.