मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन २०१७ ते २०२० मध्ये करण्यात आलेल्या स्टेशनरी खरेदीबाबत चौकशी करू, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन 2017 ते 2020 या कालावधीत बोगस बिलांवर स्टेशनरी खरेदी करून मोठ्या प्रमाणात घोटाळ झाला आहे. पुरवठादार कंपनीने दोन एजन्सीनी एकाच व्हॅट क्रमांकाची बिले सादर केली आहेत या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार आहे अशी लक्षवेधी मांडली.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ओम एंटरप्रायझेस, जय एंटरप्रायझेस, स्वस्तीक एंटरप्रायझेस यांच्याकडून शासन खरेदीच्या धोरणाप्रमाणे खरेदी करण्यात आली आहे. या संस्थांकडून ५ लाख ८४ हजार रूपयांची खरेदी करण्यात आली असून. या संस्थांना आतापर्यंत २ लाख ९२ हजार ०४७ रूपये रक्कम दिलेली आहे उर्वरीत रक्कम देणे अद्याप बाकी आहे.या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेचच चौकशी समिती नेमण्यात आली आहे.या खरेदीमध्ये अनियमितता झाली असेल तर चौकशी करू, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.