मुंबई :- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून नागपूर येथे जाणारा ३० टन रेशनचा तांदूळ पोलिसांनी ट्रकसह जप्त केला. या जप्त मालासंदर्भात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, जिल्हाधिकारी जालना यांनी याबाबत संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडे याबाबत सुनावणी सुरू आहे. रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुरवठा उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तीन महिन्यात समितीकडून अहवाल मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.