वसुंधरेची जपणुक करण्याचा संदेश विद्यार्थ्यां मार्फत घरो-घरी पोचावा -डॉ. यशवंत पाटील, प्राचार्य, पी.डब्लू.एस. महाविद्यालय
नागपूर :- वसुंधरेची जपणुक करण्याचा संदेश विद्यार्थ्यां मार्फत घरो-घरी पोचावा, जल, वायु, ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न व्हावेत म्हणून जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील यांनी आज येथे केले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या , केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्लू.एस. महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी मार्गावरील पी.डब्लू.एस. महाविद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक वसुंधरा दिन विशेष प्रचार अभियान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलतांना त्यांनी सांगितले.
डॉ.यशवंत पाटील (प्राचार्य, डॉ.मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर, प्रमुख अतिथी डॉ.पियुष अंबुलकर (जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर), मुख्य मार्गदर्शक डॉ.अविनाश तलमले, (भूगोल विभाग) मॉरिस कॉलेज नागपूर, डॉ.सुशांत चिमणकर (समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना), डॉ.कमलाकर तागडे (समन्वयक, विस्तार विभाग), डॉ.सौरभ मोहोड (समन्वयक, शारीरिक शिक्षण विभाग), केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचे संजय तिवारी, सांस्कृतिक समन्वयक डॉ मनिषा नागपुरे इत्यादी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी डॉ. वंसतराव नाईक इंस्टीट्यूट ऑफ आर्टस् एण्ड सोशल सायंसेस चे प्राध्यापक डॉ. अविनाश तलमलकर यांनी पावर पॉइन्टच्या माध्यमातून ग्लोबल वार्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, क्लायमेट चेंज वर मात करण्यासाठी ग्रीन एनर्जी, सोलर एनर्जीचा वापर करावा असे प्रतिपादन केले.
डॉ. पियुष अंबुलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक बनून चांगला समाज घडवायचा आहे. त्या करिता आपल्या वसुंधरेवर आणि आपल्या आई वडिलांवर प्रेम करा . शालेय जीवना पासूनच ही मोहिम सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मनिषा नागपुरे यांनी केले. प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्या वृक्षाचे संगोपन करून निसर्गाच्या संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी प्रस्ताविक मार्गदर्शनात केले. संचालन पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समनव्यक डॉ. सुशांत चिमणकर, यांनी केले. तर आभार डॉ.कमलाकर तागडे यांनी मानले.
या वेळी रंगधून कला मंच या संस्थेने पथनाट्याच्या माध्यमातून जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड, प्लास्टीकचा अतिवापर, ओझोन थराचा प्रश्न, सौर उर्जेचा वापर, पाण्याची बचत, जल, वायु आणि ध्वनी प्रदुषण याविषयांवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
याप्रसंगी 24 एप्रिल रोजी घेतलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण करण्यात आले.केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे प्लास्टीकचा उपयोग टाळणे , स्वच्छता अभियान आणि जागतिक वसुंधरा दिनाचा संदेश प्रिंट केलेल्या कॉटन बॅग (प्रचार साहित्य) या वेळी वितरीत करण्यात आल्या .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, केंद्रीय संचार ब्यूरो व पत्र सूचना कार्यालयाचे संजीवनी निमखेडकर, देवप्रकाश दुबे, सी.एस. चडुके, नरेश गच्छकायला, पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.