– निरामय सेवा संस्थेचा दहावा वार्षिकोत्सव
नागपूर :- सुसह्य जीवनासाठी भौतिक सोयीसुविधा आवश्यक आहेत. पण, त्यासोबतच चांगला माणूस घडविण्याच्या दृष्टीने उत्तम संस्कारही आवश्यक आहेत. निरामय सेवा संस्था हे संस्कार नवीन पिढीला देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
निरायम बहुउद्देशीय सेवा संस्थेचा दहावा वार्षिकोत्सव नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वर्धा मार्गावरील मैदानावर आयोजित करण्यात आला. यावेळी ना. नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संचालक दीपक तामशेट्टीवार, एम गिरी वर्धाचे संचालक आशुतोष मुरकुटे, इन्फोसीसच्या युरोप डिलीव्हरी विभागाचे प्रमुख तसेच वरीष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक, निरामयचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर, संचालक डॉ. रवींद्र क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा विकास साधणे, हा निरामय संस्थेचा मुख्य उद्देश आहे. एमबीबीबीएस केल्यानंतर श्रीरसागर दाम्पत्य चांगले पैसे कमावू शकले असते. पण, त्यांनी गोरगरिबांचे सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श आहे.’ ग्रामीण भागामध्ये अनेक गोष्टींचा अभाव आहे. त्यासंदर्भात सरकार काम करीतच आहे. पण सर्व समस्यांवर मात करून गोरगरीब जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निरामय संस्था काम करीत आहे, हे कौतुकास्पद आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. समाजातील गरीब जनतेला परमेश्वर मानून सेवा करीत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम करीत असल्याबद्दल ना. गडकरी यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.