शालेय स्तरावरील विविध स्पर्धांचा पहिला टप्पा पूर्ण
नागपूर : या महिन्यात नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अभिरुप जी-२० परिषद होणार आहे. जनजागृतीसाठी प्राथमिक स्तरावर नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा पार पडल्या आहेत.
जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने अभिरुप जी-२० संकल्पना मांडली आहे. यासाठी जिल्ह्यातील दोन शासकीय, चार ग्रामीण, आठ निमशासकीय आणि सहा खाजगी अशा एकूण २० शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेचे सात विद्यार्थी असे एकूण १४० विद्यार्थी या अभिरुप जी-२० मध्ये सहभागी होत आहेत. मंगळवारी (२८ फेब्रु. २०२३) जिल्हा परिषदेच्या कै.आबासाहेब खेडकर सभागृहात अभिरुप जी-२० ची रंगीत तालिम पार पडली. येत्या ९ मार्च रोजी दु. ४ वा. अंतिम रंगीत तालिम होणार असून १० मार्च रोजी सकाळी १० वा. याच सभागृहात प्रत्यक्ष अभिरुप जी-२० होणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविंद्र काटोलकर यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विभागीय आयुक्तांची उपस्थिती
प्रत्यक्ष अभिरुप जी-२० साठी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्राध्यक्षांच्या रुपात विद्यार्थ्यांची भाषणे
प्रत्येक शाळेतून निवड झालेले सात विद्यार्थी अभिरुप जी-२० मध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. यातील एक विद्यार्थी प्रत्यक्ष मंचावर जी-२० परिषदेच्या सदस्य देशाच्या राष्ट्राध्यक्ष/प्रधानमंत्री यांच्या वेशात ‘शाश्वत विकासात नागरी संस्थांची भूमिका’ विषयावर पाच मिनिटांचे संबोधन करणार आहे. याशिवाय सदस्य देशाचे नाम फलक, ध्वजवाहक म्हणून दोन विद्यार्थी सहभागी होतील तर उर्वरित चार विद्यार्थी प्रत्यक्ष सभागृहात त्या-त्या देशाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील.
प्राथमिक स्तरावरील शालेय स्पर्धांचा टप्पा पूर्ण
‘जी-२० परिषद’ आणि ‘नागरी समुदायाची शाश्वत विकासातील भूमिका’ या विषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील शाळांमधून निबंध स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा आणि जी-२० देशांतील वेशभुषास्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचा शालेय स्तरावरील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरी भागात केंद्र स्तरावर आणि ग्रामीण भागात पंचायत समिती स्तरावर स्पर्धा होत आहेत. यातून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम टप्प्यातील जिल्हा स्तरावरील स्पर्धा १० ते १५ मार्च दरम्यान पार पडणार आहे.
या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेच्या मुख्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे.