नागपूर : नागपूर शहरातील तापमानात वाढ होउ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघातासारख्या गंभीर आजारांचा धोका संभावतो. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे शक्यतो टाळा, उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, भरपूर पाणी पिणे, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करणे, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवणे, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करण्यात यावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळा, उन्हात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळा, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा, असेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार आणि सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले आहे.