– जेव्हा देशात एकही गरीब भारतीय नसेल आणि प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण असेल, तेव्हा भारत ‘विकसित भारत’ असेल: किरण रिजीजू
पुणे :-भारताला विकसित देश ही ओळख अजून मिळवायची आहे, हे वास्तव स्वीकारून आपल्याला काम करायचे आहे, हे लक्षात घ्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय संसद व्यवहार व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांनी आज पुण्यात युवकांना केले.
पुण्यातील प्रोग्रसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘विकसित भारत ॲम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी केंद्रीय मंत्री रिजीजू यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थ्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ पोर्टल विषयी संपूर्ण माहिती देताना व विविध क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेत प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या गोष्टींची माहिती देताना रिजीजू म्हणाले, “समजायला लागल्यापासून एक युवा ते संसद सदस्य, मंत्री म्हणून मला प्रश्न पडत राहिले की, देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून विकसित देश होण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत. देशाचे नागरिक देशाला विकसनशील किंवा विकसित देश बनवत असतात.
सर्वांनी मिळून स्वप्न पाहणे आणि कृती करणे, आपल्या देशाला पुढे नेईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विचाराचा उल्लेख करताना रिजीजू म्हणाले की प्रशासन चालविण्याची कार्यपद्धती आपल्याला बदलायला हवी.
आपली प्रतिमा स्वच्छ करून मूल्य वाढवायला हवे, जेणेकरून नागरिक आपल्यावर विश्वास ठेवतील.विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून रिजीजू यांनी सांगितले की, सरकार आणि नागरिकांच्या प्रयत्नातून 2047 पर्यंत आपण निश्चित विकसित देश ही ओळख मिळवलेली असेल. अमृतकाळातील प्रवासी तुम्ही आहात आणि तुम्ही नशीबवान आहात की, प्रगती करणारा भारत तुम्ही पाहत आहात. लक्ष्यवेधी यशाकडे भारत प्रवास करत आहे.
वेळेचे महत्व जाणा, असा उपस्थित विद्यार्थ्यांना सल्ला देताना रिजीजू म्हणाले की, असाच वेळ वाचवून पंतप्रधानांनी निवडणूक काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नवीन सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांची कामाची ‘ब्यू प्रिंट’ तयार करुन घेतली आणि शंभर दिवसाच्या आतच सरकारने सर्व उद्दिष्ट प्राप्त केली आहेत.
आपले मनोगत व्यक्त करताना पुढे ते म्हणाले, “तुम्ही खेळा, संगीत ऐका, मजा करा, पण देशाच्या कारभारापासून स्वतःला अलिप्त ठेऊ नका.
तसेच ‘फिट इंडिया’साठी ‘फिट इंडियन’ आवश्यक आहे, असे सल्ले देखील रिजीजू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
देशाचा विचार, पंतप्रधानांचा विचार आणि तुमचा विचार यांना जोडण्यासाठी मी येथे आलो आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री रिजीजू यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले.
‘विकसित भारत ॲम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी महाविद्यालयाच्या आवारात ‘एक पेड माँ के’ नाम उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले.
स्वतः खेळाडू असलेले किरण रिजीजू यांनी काही विद्यार्थ्यांसोबत टेबल टेनिसचा एक डाव खेळला.