सावनेर :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरु आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पराग निमिशे यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी यशवंत शितोळे, अध्यक्ष म. मा. तं. सहाय्यता केंद्र, डॉ. शरयू तायवाडे, जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, डॉ. वर्षा वैद्य, जिल्हा समन्वयक, डॉ. अर्चना पाटील, जिल्हा समन्वयक (ग्रा.) करिअर कट्टा प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर कट्टाची संकल्पना उलगडतांना स्पर्धा परीक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योगातील संधी यावर सविस्तर विवेचन केले. मोबाईल चा उपयोग विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कसा करावा याचे सुद्धा परिणामकारक मार्गदर्शन केले.
डॉ. शरयू तायवाडे यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा सारख्या शासकीय उपक्रमांचा आणि तत्सम योजनाचा उपयोग करिअर साठी करावा असे प्रतिपादन केले. नियमित अभ्यासक्रम करतांना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करीअर मधील संधी शोधाव्या व अविरत प्रयत्नरत रहावे असे अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा. निमिशे म्हणाले.
या प्रसंगी तालुक्यातील महाविद्यालयातील करिअर संसद च्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक चंद्रशेखर पोटोडे यांनी तर प्रास्ताविक डॉ. अर्चना पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन प्रा. विलास डोईफोडे यांनी केले.
या प्रसंगी भालेराव महाविद्यालय, ह. आदमने महाविद्यालय, राम गणेश गडकरी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय येथील अनेक विद्यार्थ्यांनी अभियानाचा लाभ घेतला. प्रा. मिलिंद बरबटे, प्रा. सुनील डोंगरे, प्रा. प्रकाश काकडे, प्रा. रवींद्र भाके, प्रा. अमिता वाटकर, प्रा. प्रशांत डबरासे, प्रा. प्रणिता साळवे, प्रा. प्रवीण दुलारे, प्रा. ताजने, प्रा. जोगी, विलास सोहगपुरे, राष्ट्रीय सेवा योजना, करिअर कट्टा च्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.