– विभागात आतापर्यंत ४२ टक्के शेतकऱ्यांचा सहभाग
नागपूर :- “प्रधानमंत्री पीक विमा योजना” खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस उरले असून या योजनेत शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावर यांनी केली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत या योजनेंतर्गत ६ लाख ४० हजार ३३१ अर्थात ४२.३ टक्के शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
या योजनेत सहभागी होण्याकरिता केवळ १ रुपया भरुन PMFBY पोर्टल http://pmfby.gov.in वर स्वत: शेतकऱ्यांना तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्रांमार्फंत योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.
या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू झाली असून सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
वर्धा जिल्ह्यात ५१.९ टक्के शेतकऱ्यांचा सहभाग
नागपूर विभागामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २९ जुलै २०२४ पर्यंत ६ लाख ४० हजार ३३१ (४२.३ टक्के) शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १ लाख १४ हजार २११ (५१.९ टक्के) शेतकऱ्यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ६०० (४४.७ टक्के), भंडारा जिल्ह्यातील ९८ हजार ६० (४१.१ टक्के), गोंदिया जिल्ह्यातील ८४ हजार ७१५ (३२.८टक्के), चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २१४ (४७.२ टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यातील ४६ हजार ५३१ (३०.७ टक्के) शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे