– अग्निशमन विभागाचे जवान पावसातही कर्तव्यावर
नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी उपसण्यासाठी आठ मोटारपंप लावण्यात आले आहेत. यापंपाव्दारे दररोज 18 तास पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र, मधून मधून पाउस येत असल्याने पाणी उपसण्यासाठी बर्याच अडचणी येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठविले होते. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले. राज्य शासनाने या विषयाची तत्काळ दखल घेतली असून येथील पाणी उपसण्याची निर्देश दिले. अग्निशमन जवान युध्दपातळीवर पाण्याचा उपसा करीत आहेत.
मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाचे 20 जवान दररोज 18 तास काम करीत आहेत. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाण्याचा उपसा करीत आहेत. पाउस येत असल्याने पाण्याची पातळी पुन्हा वाढत आहे. त्यामुळे किती दिवसात हा खड्डा रिकामा होईल, हे निश्चित सांगता येत नाही, असे चंदनखेडे म्हणाले. पावसाने विश्रांती घेतल्यास हे काम लवकर होईल, असेही त्यांनी सांगितले.
साडे सहा मीटर खोल खड्ड्यातील 30 टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. दरम्यान पाउस येत असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याचा उपसा करून पावसाळी पाणी वाहून नेणार्या नाल्याव्दारे पाणी बाहेर काढल्या जात आहे. दरम्यान भदंत ससाई या कामावर लक्ष ठेवून आहेत.