संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– राजकीय जाहिरातिचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक-नोडल अधिकारी संदीप बोरकर
कामठी :- येत्या 19 एप्रिल ला होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघ प्रशासन सज्ज आहे. कामठी नगर परिषद सभागृहात आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यरत असून उमेदवारांच्या प्रचारार्थ परवानगी साठी एक खिडकी योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे.तर केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असून राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी इच्छूकानी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत कामठी नगर परिषद सभागृहातील आदर्श आचारसंहिता कक्षातील माध्यम प्रमाणीकरण समिती कक्षात सादर करावे असे आवाहन कामठी विधानसभा मतदार संघ आदर्श आचार संहिता प्रमुख नोडल अधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिराती बाबत नियमावली ठरवून दिली आहे त्यानुसार राजकीय पक्ष व उमेदवार यांना दूरचित्रवाणी वाहिन्या,केबल नेटवर्क,केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफ एम चॅनेल्स,दृक्श्राव्य जाहिराती,ई वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कारावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस ,रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेजेस,सोशल मीडिया ,इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती यांना माध्यम प्राधिकरण आणि सनियंत्रण समितीकडून पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पक्ष ,उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या 48 तास अगोदर प्रमाणिकरनांसाठी जाहिरात व अर्ज सादर करावा .जाहिरात नियमानुसार नसल्यास या सनियंत्रण समितीला प्रमाणीकरण नाकारण्याचा अधिकार आहे.टीव्ही चॅनलद्वारे जाहिराती जर प्रसारित करावयाच्या असतील तर अशा जाहिराती समितीकडे प्रसारण्याच्या तीन दिवस अगोदर प्रमाणीकरणसाठी सादर करणे आवश्यक आहे समिती याबाबत दोन दिवसात निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमती शिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत.अनुमतीशिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकारवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधिला नोडल अधिकारी संदीप बोरकर यांनी दिली.
-जाहिरातीमध्ये आदर्श आचारसंहीतेनुसार दिलेल्या निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे.यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी,धार्मिक भावना दुखावणे,भारतीय घटनेचा अपमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे,कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे,गुन्हेगारांचे उदात्तीकरण महिलांचे चुकीचे चित्रण,तंबाकुजन्य किंवा नशा आदी पदार्थाच्या जाहिराती,हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारीत करण्यास प्रतिबंध आहे.इतर देशावर टीका नसावी,न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये,राष्ट्रपती ,न्याय संस्था यांच्या बाबत साशंकता नसावी,राष्ट्रीय एकात्मतेला ,सौहाद्रतेला आणि एकतेला बाधा पोहोचविणरा मजकूर यात नसावा ,सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक,व्यक्ती,अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे ,कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी/व्यक्तिक जीवनातील घटनांना धरून त्यावर भाष्य नसावे ..