बिहार राज्याची स्थापना २२ मार्च १९१२ रोजी झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’ म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा. ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता. स्वातंत्र्या नंतर बिहारचे नेतृत्व श्रीकृष्ण सिंह या उच्चशिक्षित स्वातंत्र्यसेनानींनी सलग १७ वर्षे केले. ‘आधुनिक बिहारचे निर्माते’ अशी त्यांना उपाधी लावली जात होती. समाजातील सर्व घटकांचे ते काळजीवाहक होते. ग्रामविकास ते उद्योगधंदे उभारणी, शिक्षण संस्थांची उभारणी ते नवे प्रयोग करण्यात आघाडीवर होते. १९८० नंतर बिहारची घडी बिघडत गेली. पण मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी अलीकडच्या काळात बिहारचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. एकेकाळी संपन्न असणारा हा प्रांत विभाजित होऊन झारखंड राज्याची निर्मिती झाल्यावर आर्थिकदृष्ट्या अडचणीतच आला. बोकारो, धनबाद, जमशेठपूर, रांची हा दक्षिणेचा भाग औद्योगिकरणाने प्रगत होता. झारखंड मधील खाण उद्योगातून महसूल मिळत होता. झारखंड राज्याची २००० मध्ये निर्मिती झाली. दक्षिण बिहारचा झारखंड झाला आणि केवळ शेतीवर अवलंबून असणारा बिहार तयार झाला.
– बिहार दिना निमित्त काही रोचक गोष्टी
* बिहार हा शब्द (संस्कृत आणि पाली शब्द) विहार (मठ किंवा मठ) पासून आला आहे. बिहार बौद्ध संस्कृतीचे जन्मस्थान आहे, म्हणूनच या राज्याचे नाव पहिले विहार होते आणि ते बिहार बनले.
* बिहार पूर्वी मगध म्हणून ओळखला जात असे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणाचे पूर्वी पाटलीपुत्र असे नाव होते. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे बिहारचे होते.
* बुद्ध आणि जैन धर्माचा उगम बिहार मधून झाला. भगवान बुद्ध आणि महावीरांचा जन्म याच राज्यात झाला.
* बिहार मधील नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. १२व्या शतकानंतर नालंदा विद्यापीठाची तोडफोड करुन नुकसान केले होते. या जागेचे अवशेष अजून असून, २०१६ मध्ये या जागेचा युनेस्कोच्या जागतिक वारसा मध्ये समावेश केला गेला.
* बिहार मध्ये दरवर्षी आशियातील सर्वात मोठी जनावरे यात्रा (सोनपुर मेळा) आयोजित केली जाते. बिहार मधील सोनपूर भागात दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये (कार्तिक पूर्णिणेच्या वेळेस) हा मेळा भरतो.
* बिहार मधील मुंडेश्वरी मंदिर, हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते, हे मंदिर भगवान शिव आणि पार्वती देवीचे आहे.
* विश्व प्रसिद्ध गणितज्ञ आर्यभट हे बिहारचेच होते.
लैंगिक संबंधांवरील सर्वात प्रसिद्ध ‘कामसूत्र’ पुस्तक लिहिणारे लेखक वात्स्यायन हे बिहारचे होते.
* शिखांचे दहावे गुरु (गुरु गोबिंद सिंह) यांचा जन्म बिहार मध्येच झाला होता. हरमिंदर तख्त (पटना साहिब) पाटण्यात आहेत.
* बिहारचा वैशाली जिल्हा हा जगातील पहिला गणराज्य मानला जातो. याच ठिकाणी भगवान महावीरांचा जन्म झाला होता.
* भारताचे प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य आणि अशोक हे बिहारचे होते.
* मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा अहवाल देणारे बी.पी. मंडल हे बिहारचे सुपुत्र होत.
* २०१९ मध्ये नीतीश कुमार यांनी विक्रम करत ते सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. नोव्हेंबर २००५ पासून नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत.
* दरवर्षी बिहार दिनानिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
– दिनेश दमाहे