सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथील बी. एस सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या नोबेल पुरस्कार मिळालेल्या “रमण इफेक्ट” या शोधाच्या निमित्याने २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. केंद्र शासनातर्फे यासाठी “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” अशी संकल्पना देण्यात आली होती. याप्रसंगी श्रुती जामदार, प्रणाली खंते, अक्सा सलमानी, सेजल ताजने आणि प्रज्वल धांडे या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे औचित्य, संकल्पना आणि महत्व विषद केले. सर्व धर्म आणि भारतीय अध्यात्मातील विज्ञान समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेक वापरून प्रगती कशी साधता येईल यावर प्रा. डॉ. विलास डोईफोडे, विभागप्रमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. डॉ. अमिता वाटकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, नवीन तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता सतर्कतेने त्याचा उपयोग करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आकांक्षा ऋषिया तर आभारप्रदर्शन प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनश्री लेकूरवाळे, साक्षी कुरळकर, विलास सोहागपुरे आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
भालेराव महाविद्यालयात विज्ञान दिवस साजरा…
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com