संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रसृष्टीला राज्य घटनेने स्वातंत्र्य दिले आहे.जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार घटनेनेच पत्रकारांना दिले आहे.परंतु दहशत माजवून ,हल्ला करून पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम सुरू आहे.पुण्यात रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला झाला या घटनेचा निषेध करण्यात येत असून शासनाने अशा हल्लेखोर आणि दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी कामठी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले आहे.
पुण्याच्या डेक्कन येथील खंडूजी बाबा चौकात शुक्रवार 9 फेब्रुवारीला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.त्यांच्या अंगावर शाइफेक करण्याचा प्रयत्न झाला.वास्तविकता विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे ,गुंडशाहीने व्यक्ती मारता येतो मात्र विचार मारता येत नाही.म्हणून कायदा हातात घेणाऱ्यांना तो कोणत्याही पक्ष संघटनेचा पदाधिकारी,कार्यकर्ता अथवा समर्थक असो त्याला कडक शासन झालेच पाहिजे.
पत्रकार हे पारदर्शक पद्धतीने जनतेचा आवाज शासना पर्यंत पोहोचविण्याचा काम करतात परंतु दहशत, हल्ले करून पत्रकारांच्या अधिकारावर गदा घालण्याचे काम सुरू आहे.पत्रकारांचे लिखाण,बोलणे यावर दहशतीच्या माध्यमातून निर्बंध घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.वास्तविक पाहता पत्रकार धर्म,राजकारण बाजूला ठेवून वस्तुस्थिती मांडत असतो .मुजोर सत्ताधाऱ्यांना आपल्या लेखनिच्या माध्यमातून सत्तेतून खाली खेचू शकतो,हे लक्षात घेण्याची गरज आहे.पत्रकारावर होणारे हल्ले हे पत्रसृष्टी खपवून घेणार नाही.त्यामुळे पत्रकारांचा आवाज दाबू नये.ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप कांबळे जाहीर निषेध करीत असून पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी शासनाने कडक कारवाही करावी.