Ø 1 लाखावर नागरिकांची आरोग्य तपासणी
Ø कृषी विकासाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ
नागपूर :- केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू असून विभागातील 6 लाख 60 हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदविला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ही संकल्प यात्रा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 26 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी वैयक्तीक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून राज्यभर ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ 26 नोव्हेंबर 2023 पासून सुरु आहे. विभागात 3 हजार 616 पैकी 1 हजार 768 ग्रामपंचायतींपर्यंत ही यात्रा पोहचली आहे. यात 3 लाख 48 हजार 735 पुरुष आणि 3 लाख 8 हजार 870 महिला व विविध क्षेत्रातील 2 हजार 400 मान्यवर अशा एकूण 6 लाख 60 हजार 5 नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. विभागात 30 संकल्प रथांच्या माध्यमातून प्रमुख योजनांसंदर्भात हिंदी आणि मराठी भाषांमध्ये चित्रफिती, माहिती पत्रके, पुस्तिका आणि स्टँडीजचा उपयोग करत योजनांची माहिती देण्यात येत आहे.
या यात्रेदरम्यान, विभागात 1 लाख 66 हजार 337 नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे. यात क्षय रोगाच्या 44 हजार 575, सिकलसेल आजाराच्या 35 हजार 330 तपासणींसह अन्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आहेत. तर 3 लाख 63 हजार 149 आयुष्मान भारत कार्ड वितरीत करण्यात आले आहेत.
या संकल्प यात्रेद्वारे मृदा आरोग्य कार्ड, नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद, जमीन नोंदीचे डिजीटायजेशन आदींचा लाभ शेतकरी घेत आहेत. हर घर जल योजनेची माहिती देणे व लाभार्थ्यांना अभिनंदन पत्र वितरण, हागणदारी मुक्त ग्रामपंचायतींना अभिनंदन पत्राचे वितरण करण्यात येत आहे. सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, पीएम किसान आणि पीएम क्रेडिट कार्ड आदींचीही माहिती देण्यात येत आहे. माय भारत व्हाल्युंटियर आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांसाठी नोंदणींसह या यात्रेत सहभागी लाभार्थी संकल्प घेत आहेत. आतापर्यंत 4 लाख 15 हजार 428 नागरिकांनी संकल्प घेतला आहे.
डॉ. खोडे यांनी नुकतेच दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या सोबत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा आढावा घेतला असून या मोहिमेस गती देण्याचे सूचना केल्या आहेत. तसेच जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या संकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.