Ø उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार
Ø 5 लक्ष प्रथम तर 2.5 लक्ष रुपयाचे व्दितीय पारितोषिक
Ø 41 मंडळाचा राज्यशासनाकडून गौरव
Ø 15 सप्टेंबर पर्यंत स्पर्धेसाठी अर्ज स्विकारणार
नागपूर :- सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट ठरलेल्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनातर्फे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विभागातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कारासाठी येत्या 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवात उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या तीन मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास 2.5 लाख रुपये तर तृतीय क्रमांकास १ लाख रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेश मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विभागातील गणेश मंडळांनी मोठया संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबर पासून सुरु होत असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर केली आहे. यानुसार मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. या 44 गणेशोत्सव मंडळामधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये 5 लक्ष, व्दितीय क्रमांकास 2.5 लक्ष व तृतीय क्रमांकास 1 लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कारामध्ये सहभाग घेण्यासाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्पर्धेचा तपशिल, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच सोबत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विहीत नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल पत्यावर दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळाने भाग घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले आहे.