नागपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित बांधवांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मूलमंत्र दिला. मात्र सुशिक्षितांना या मूलमंत्राचा विसर पडत चालला आहे. शिक्षित झालेला समाजबांधव स्वार्थी झाला. असंघटित बांधवांना संघटित करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अपेक्षित होते. आता सुशिक्षित बांधवांची प्रतीक्षा न करता आपल्या अधिकारांसाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची खरी गरज आहे, असा धम्मसंदेश दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी अनुयायांना दिला.
ससाई पुढे म्हणाले, शक्ती आणि प्रतिष्ठा केवळ संघर्षातून प्राप्त होते. आपला लढा माणूस म्हणून जगण्यासाठीचा आहे. वेळप्रसंगी न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावाच लागतो. असंघटित राहून लढाई जिंकता येत नाही. त्यामुळे आता संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे.
जगाच्या कानाकोपर्यात बाबासाहेबांचे विचार पोहोचले आहेत. बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार आत्मसात न केल्याने समाज संघटित होऊ शकला नाही आणि समाजाची प्रगती खुंटली. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार खर्या अर्थाने आत्मसात करण्याची गरज आहे. किंबहुना त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल आणि जीवन सुखमय करता येईल, असेही सुरेई ससाई म्हणाले. विषमतेच्या विळख्यात सापडलेल्या संपूर्ण जगात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा विचारच शांतता निर्माण करू शकतो. कोंडमारा झालेल्या श्वासाला मुक्त करण्यासाठी आंबेडकरी विचारांपासून प्रेरणा घेऊन जगा. आंबेडकरी क्रांती प्रत्येकाने डोळ्यात साठवली पाहिजे, असे आवाहनही ससाई यांनी केले.