महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद
नागपूर : या देशातील गावे आदर्श असावीत. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी. त्यामाध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते.मात्र स्वातंत्र्यानंतर या संकल्पनेला छेद दिला गेला हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘भारतीय स्वतंत्रता की आंधी महात्मा गांधी’ या विषयावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या फेसबुक लाईव्हचे आयोजन रविवारी (ता.३०) करण्यात आले होते.
विषयावर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी पुकारलेला स्वातंत्र्य लढा हा अहिंसेवर आधारित होता. यासाठी त्यांना जरी विरोध झाला असला तरी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सोबत आला. कारण स्वातंत्र्य हेच प्रत्येकाचे उद्दिष्ट होते. गांधी हा विचार आहे, जो या देशासाठी कायम प्रेरणादायी आहे. आज महात्मा गांधी यांचे जितके पुतळे या देशात आहे कदाचित त्यापेक्षा अधिक दक्षिण आफ्रिकेत असतील. जगभरातील अन्य देशातही आहेत. नागपुरात जेव्हा स्वामी विवेकानंद यांचा पुतळा तयार करण्यासाठी नागपुरातील कलावंत राम सुतार यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत गांधीजींचा सर्वात उंच पुतळा बनविण्यात व्यस्त होते. आजवर जगभरात शेकडो गांधीजींचे पुतळे त्यांनी तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अंमलात आणलेल्या विचारांवर प्रकाश टाकला. वर्धा शिक्षण योजना, स्कील डेव्हलपमेंट, स्वयंरोजगार, ग्रामसमृद्धी आदींबाबत त्यांनी माहिती दिली.
गांधीजींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला नाही. मात्र ज्या देशात हात बरेच असतील तेथे त्या हातांना काम मिळणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी सातत्याने लघु उद्योगांचा पुरस्कार केला. व्यक्ती मशीनवर काम करत असेल आणि त्याचा हात त्यात गेला तर त्या मशीनच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही. म्हणजेच तेथे संवेदनशीलता नाही. जेथे संवेदनशीलता नाही अशा व्यवस्थेचा गांधीजींनी विरोध केला. ग्रामीण उद्योगांना चालना दिल्याचे त्यांनी सांगितले. आज देशाला त्यांनी सांगितलेल्या मार्गाची गरज आहे. त्यांचे विचारच या देशाच्या प्रगतीत मोलाचे ठरतील, असे ते म्हणाले.