– 7 एप्रिल रोजी राज्यस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ
नागपूर :- मृत्यू पश्चात अवयवदान केल्यास आपण इतरांचे जीवन सुसाह्य करु शकतो. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानासाठी स्वयंस्फूतीने सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.
शिक्षण व संशोधन विभागातर्फे राज्यात 7 एप्रिल ला अवयव दान जागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. या अभियाना संदर्भात पूर्व आढावा बैठकीत डॉ. खोडे बोलत होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त दीपाली मोतीयाळे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ.वैशाली शेलगावकर, सहयोगी प्राध्यापक डॉ.शितल दलाल, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राधा मूंजे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना खोडे म्हणाल्या की, अवयवदानामुळे गरजवंतांच्या आयुष्यात जीवन जगण्याची नवीन उमेद निर्माण होत असल्याने आपली नैतिक जबाबदारी समजून अवयवदानासाठी पुढे यावे, मृत्यूनंतर आपण डोळे दान करु शकतो यासाठी प्रत्येकाने अवयव दान संम्मती पत्र भरावे. असे त्या यावेळी म्हणाल्या.
‘अंगदान व महादान’ उपक्रमाचा शुभारंभ
शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी अवयवदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर येथे 7 एप्रिल रोजी ‘अंगदान व महादान ’ या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. भारतात दर दिवसाला 6 हजार लोकांचा मुत्यू हा अवयवदान न मिळाल्यामुळे होतो. यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अवयदान विषयाची जागृती निर्माण करावी असे डॉ. वैशाली शेलगावकर यांनी सांगितले.
2 लाख नागरिक अवयदानाच्या प्रतिक्षेत
भारतामध्ये किडनी आणि यकृत या आजारांच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. 2 लाख नागरिक किडनी आणि यकृत अवयवदानाचा प्रतिक्षेत आहे. त्यापैकी 4 हजार 800 रूग्णांना किडनी तर 500 लोकांना यकृत व्दारे अवयदान मिळाले आहे. 30 लाख लोकांना अंधत्व आजार असून 28 टक्के अधंत्व हे 10 ते 12 वयोगटातील मुलांना बुबुळ नसल्यामुळे सुंदर जग पाहता येत नाही. यामुळे नागरिकांनी अवयदानाचा संकल्प करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ह्दय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, स्वादुपिंड या अवयवांचे दान केवळ ब्रेन डेथ झाल्यानंतर करता येते. कॉनिया डोळयातील बुबुळांच्या वरील गोलाकार, त्वचा, ह्दयाची झडप, अस्थि, स्नायुबंध इत्यादी ऊतीचे दान ह्दयक्रिया बंद पडून मृत्यू आल्यानंतर करता येते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शितल दलाल यांनी केले तर आभार डॉ राधा मुंजे यांनी मानले.