मुंबई, दि. 23 : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत काही प्रकरणात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील व्यापाऱ्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्याकडून काही प्रकरणात टाळाटाळ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, भाई जगताप यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, विमा कंपन्याकडून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे ८०० दावे दाखल होते त्यापैकी ५१५ दावे निकाली निघाले आहेत. तर २८५ दावे प्रलंबित आहेत तर फ्युचर जनरल लिमिटेड कंपनीकडे १३ दावे दाखल पैकी १३ ही प्रलंबित आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे २३३ दाखल दाव्यांपैकी १४० दावे निकाली काढण्यात आले आहेत ७० दावे प्रलंबित २० दावे नाकारलेले आहेत तर २ परत घेतलेले दावे आहेत एस.बी.आय जनरल कडे १८ दावे दाखल होते त्यापैकी ११ दावे निकाली काढले आहेत. ७ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित दाव्याबाबत विमा कंपन्याना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तसेच विमा कंपन्यानी सहकार्य करावे या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच या विमा कंपन्या जर नुकसान भरपाई देत नसतील तर हे व्यापारी ग्राहक न्यायालयातही दाद मागू शकतात, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.