नागपूर :-नवीन शिक्षण धोरणानुसार पटसंख्या कमी असल्याचे दाखवून राज्यातील 15 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन घेत आहे. “वन नेशन वन एज्युकेशन” या धोरणानुसार त्या सर्व शाळांमध्ये सीबीएसई चे शिक्षण देऊन लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य वाचवावे अशी मागणी नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील बसपा च्या शिष्टमंडळाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
हल्ली स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगर पालिकांच्या मराठी, हिंदी, उर्दू शाळेत शिकणारा विद्यार्थी हा इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांची बरोबरी करू शकत नाही. राज्याच्या व केंद्राच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बरीच तफावत आहे.
केंद्रातर्फे घेण्यात येणारी मेडिकलची NEET व इंजीनियरिंग ची JEE तसेच UPSC सारख्या परीक्षेत हा विद्यार्थी बिलकुल टिकत नाही. त्यामुळे प्रत्येक गरीब पालक आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देणाऱ्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्याचा विचार करतो. परंतु या शाळेतील अवाढव्य फी त्याच्या आवाक्या बाहेर असल्याने हे मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहतात.
कराच्या रूपात ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगर पालिका जो पैसा गोळा करतो त्यात शिक्षण कराची रक्कम मोठ्या प्रमाणात शासनाला उपलब्ध होत असते. ग्रामीण व शहरातील शाळेच्या इमारती व जागा या शासनाच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे शिक्षण कराच्या पैशातून त्याला सुसज्ज करता येऊ शकते व त्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिल्या जाऊ शकते. असे झाल्यास या शाळेतील गळती थांबेल व सर्वसामान्यांना संविधानाने दिलेल्या राईट टू एज्युकेशन चा लाभ मिळेल.
जर असे झाले नाही तर महाराष्ट्र राज्यातील 15 हजार शाळा ज्यात विदर्भातील 3,523, ज्यामध्ये नागपुरातील 555 शाळा, मराठवाड्यातील 2,163, पश्चिम महाराष्ट्रातील 4,831, पुणे व मुंबईतील 4,091, खांदेशातील 391 सरकारी शाळांचा समावेश आहे.
15 हजार सरकारी शाळा बंद करून त्या इमारतींची जागा खाजगी शिक्षण माफीयांच्या संस्थांना देऊन गरिब व मागास वर्गीयांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे षडयंत्र रचले आहे. असाही आरोप बसपाने या निवेदनात केला आहे. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय मागे घेऊन त्या सर्व ठिकाणी सीबीएसई चे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्या अन्यथा बसपा राज्यभर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात युवा नेते सदानंद जामगडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, उमरेड चे शशिकांत मेश्राम, वाडीचे वीरेंद्र कापसे, आर्यन मेश्राम, राहुल उके, प्रफुल गणवीर, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, गौतम गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.