– सुरक्षेच्या दृष्टीने मनपाद्वारे कार्यवाही : चार पम्पांद्वारे पाण्याचा उपसा
नागपूर :- नागपूर शहरात शनिवारी (ता.२७) सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाद्वारे येत्या चोवीस तासात आणखी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. अश्यात अंबाझरी तलावाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तलावातील पाण्याचा उपसा करून नाग नदीमध्ये त्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.
शनिवारी २७ जुलै रोजी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे अंबाझरी तलावातील पाण्याची पातळी वाढली. मागील वर्षी उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने सिंचन विभागाद्वारे तलावाच्या सांडव्याची भिंत कापून उंची कमी करण्यात आली. त्यामुळे ओव्हरफ्लोची पातळी ३१६.२४ मीटर झाली. शनिवारच्या पावसामुळे तलावातील पाण्याने ओव्हरफ्लोची ३१६.२० मीटर एवढी पातळी गाठली. तलावातील पाणी ओव्हरफ्लो होण्यापासून केवळ ०.०४ मीटर एवढेच अंतर बाकी असल्याने मनपाद्वारे पाण्याचा उपसा करून नाग नदीमध्ये विसर्ग सुरु करण्यात आला. मनपाद्वारे पावसाळ्यापूर्वी तयारी अंतर्गत नाग नदीची सखोल स्वच्छता करण्यात आली. यावर्षी नदी स्वच्छता अभियानामध्ये नाग नदीचे पात्र खोल करण्यात आले तसेच पात्राची रुंदी देखील वाढविण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार तलावाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी चार पम्प लावण्यात आले आहेत. यातील दोन पम्पमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय १५० मिमी व्यासाच्या पाईप मधून देखील पाण्याचा निचरा सुरु आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.
अंबाझरी तलावातील पाण्याची पातळी वाढून सांडव्यावरून एकाचवेळी जास्त प्रमाणात पाण्याचा निचरा झाल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये उद्देशाने मनपाद्वारे पाण्याचा उपसा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.