– संजय गांधी’ व ‘श्रावण बाळ’साठी आधार अपडेट करून मोबाईल सोबत जोडणे सक्तीचे!*
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आदेश;
– लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर मिळणार पैसे
– ३१जानेवारी शेवटची तारीख
कोंढाळी/-काटोल :- निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट ‘डीबीटी’ मार्फत या निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यासाठी आधारकार्ड अपडेट करून मोबाइल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यभर सुरू करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यात सुद्धा हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२५ची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यासह विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी यापूर्वी काटोल चे तहसीलदार यांचेकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता; तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत फेर्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचार्यांची कसरतही थांबणार आहे. सरकारच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड ला मोबाइल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. निराधार व्यक्तींना आता कागदपत्रे अपडेट करून घ्यावी लागतील. बहुतेक व्यक्तींना आधारकार्ड, बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक करावा लागेल. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात, असी माहिती काटोल तालुक्याचे तहसीलदार राजू रणवीर व संजय गांधी निराधार अनुदान योजने चे अधिकृत अधिकारी नायब तहसीलदार भागवत पाटील यांनी दिली आहे.
काटोल तालुक्यात या योजनेच्या अंतर्गत एकूण २६०००हजार लाभार्थी आहेत.