नागपुर- १९९५ च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ५% निधी हा दिव्यांगाच्या कल्याणाकरिता राखीव ठेवण्याचा नियम आहे. सदर निधी थेट दिव्यांगाच्या खात्यात जमा करण्याचा नियम असतांना सुद्धा मागील कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधव हे निधीपासून वंचित होते. याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहराद्वारे अनेक वेळा निवेदने देण्यात आली. निवेदनाने समाधान ना झाले असता प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने संविधान चौकात तब्बल ७ दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. याच आंदोलनाला प्रहारचे संस्थापक व महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री मा. ना. बच्चू कडू यांनी भेट दिली असता मनपा आयुक्तांना त्वरित निधीचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु नागपूर महापालिकेच्या वेळकाढू धोरणामुळे दिव्यांग बांधवाना प्रतिक्षाच करावी लागली. परंतु आज समस्त दिव्यांग व प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष राजेश बोढारे यांचे नेतृत्वात अनेक दिव्यांग बांधवांनी महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात ठिया आंदोलन केले. जो पर्यंत दिव्यांगाच्या हक्काचा निधी मिळत नाही तोपर्यंत प्रशासकीय भवन सोडणार नसल्याची चेतावणी प्रहार तर्फे देण्यात आली. शेवटी प्रहारच्या आंदोलनाची दखल घेत नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अधिकाऱ्यांना त्वरित निधीचा धनादेश दिव्यांग बांधवांना देण्याचे निर्देश दिले.
आपल्या वक्तव्यात प्रहार चे शहर अध्यक्ष राजेश बोढारे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधव आपल्या हक्कच्या निधीची मागणी करीत असता महानगरपालिका फक्त आश्वासन देत होती. पण आता दिव्यांगांचा मदतीला प्रहार जनशक्ती पक्ष आहे. येत्या काळात उर्वरित दिव्यांगाना सुद्धा निधीचा वाटप करण्याचे आश्वासन महापौर तिवारी यांनी दिले.
यावेळी प्रमुख रूपाने शहर कार्यध्यक्षा शबिना शेख, दिव्यांग अध्यक्ष उमेश गणवीर, महिला अध्यक्ष ज्योती बोरकर, सचिव धरम पडवर, मो.इरफान, अरमान खान, सचिन पांडे, सलाम भाई, नियाज उद्दीन बॅग, रिजवान भाई, अरिहंत खोंडे, अश्विन पाखमोडे, व मोठ्या प्रमाणात प्रहार चे दिव्यांग कार्यकर्ते उपस्थित होते