गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई द्वारे उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ व ०१ डिसेंबर, २०२४ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडपात्र प्रकरणे विशेष लोकअदालतीमार्फत निकाली काढण्याकरीता विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपुर व औरंगाबाद खंडपीठ यांनी विशेष लोकअदालतीमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयातील न्यायाधिकरणातील प्रकरणे ही उच्च न्यायालयात दाखल झालेली आहेत व प्रलंबित आहेत अशी प्रकरणे वरील नमुद केलेल्या कालावधीमध्ये विशेष लोकअदालतीचे माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने आपल्या जिल्हयातील पक्षकारांची उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीचे माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत. तरी ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत अशा पक्षकारांनी आपल्या प्रकरणांविषयी जिल्हा न्यायालयात / जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जावून चौकशी करावी आणि प्रकरणे मिटवण्याकरीता विशेष लोक अदालतीचा फायदा घ्यावा.
विशेष लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. विशेष लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.
विकास शि. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली आणि आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी उच्च न्यायालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विशेष लोकअदालतीचा फायदा जास्तीत जास्त जनतेला घेता यावा आणि ज्यांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी या विशेष लोकअदालतीमध्ये सहभागी होवून आपसी तडजोडीने प्रकरणे मिटवावीत याकरीता जनतेला आवाहन केले आहे.