Ø जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक ;रेती धोरणाचा फेरआढावा घेणार
नागपूर :- नागपूर व आसपासच्या परिसरात निर्माण झालेली परिस्थिती आकस्मिक आहे. पाऊस ढगफुटी सदृश्य होता. सोयाबीन व संत्रा पिकावरची कीडही गंभीर आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निर्धारित पद्धती सोबतच वाढीव मोबदला देण्याबाबत शासन पंचनाम्यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
काल अकोला, नागपूर जिल्हा व आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर भागात नुकसानाची पाहणी केल्यानंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवनात सायंकाळी त्यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीमध्ये पंचनाम्यांचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करून अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायसवाल, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जीवीतहानी, घरांचे, शेती पिकांचे, रस्त्यांचे, झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
राज्य शासनाने रेती व्यवहारात यापूर्वी सुरू असणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नवे धोरण आणले होते. शासनाचा याबाबतचा उद्देश स्पष्ट होता. मात्र सुरुवातीच्या काळानंतर सध्याच्या टप्प्यात धोरणात काही बदल करावे लागू शकतात. त्यामुळे योजनेचा शासन फेरआढावा घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पिक विमा देण्याच्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी ठरल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्राच्या अनेक दुर्गम भागात शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ विपरीत परिस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेला दीर्घकाळासाठी नियोजनबद्ध रित्या अमलात आणावे अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना केली.
यावेळी सेतू केंद्राच्या माध्यमातून सामान्य माणसाला सुविधा मिळताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही, अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच वाढता ताण लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच सेतू केंद्र सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले .
नागपूर मध्ये 23 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यापूर्वी नुकसानाची पाहणी केली आहे. गेली दोन दिवस महसूलमंत्र्यांनी देखील पाहणी केली आहे.