नागपूर :- यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. महायुतीत आणि भाजपात उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. जिंकण्यासाठी काम करायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराच भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते.
अमित शाह यांनी यावेळी विधानसभा निवडणुकांची रणनीती सांगत मार्गदर्शन केले. मतदारसंघातील बूथवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी व नेत्यांना केले. भाजपला विदर्भच महाराष्ट्राची निवडणूक जिंकून देईल, असे ते म्हणाले.
निवडणूक जिंकण्याचा मंत्र अमित शाह यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, गाव पातळीवर निवडणूक हरलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करा. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ वर दहा टक्के मत वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नेते हेदेखील पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, प्रत्यक्ष बुथवर जाऊन काम करावं लागेल, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीत कानपिचक्या दिल्या. प्रत्येक बूथवरील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष केंद्रित करा, त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा. भाजपात विधानसभा निवडणुकांवेळी मतदारसंघात गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराजी हे मी बिलकुल सहन करणार नाही, अशा शब्दात राजी-नाराजीवर अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिलाय.
पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस आहेत, त्यात नवरात्रीमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असणार आहे. यावेळी, कार्यक्रम व उत्सवासाठी लोकं एकत्र येतात. त्यामुळे, विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्ते फिरले पाहिजे, अशा सूचनाही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केल्या.