संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरात कायद्याचे राज्य निर्माण व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने 14 मे 2016 रोजी कामठी पोलीस ठाण्याचा नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या कारभाराच्या उदघाटन प्रसंगी स्पष्ट निर्देशानुसार एसीपी यांच्या मुख्य उपस्थितीत आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार निवारण केंद्र रांबविण्याचे निर्देश देण्यात आले.त्यानुसार जुनी कामठी व नविन कामठी पोलीस स्टेशन येथे एसीपी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण केंद्र राबविण्यात आले मात्र 28 नोव्हेंबर 2016 रोजी तत्कालीन एसीपी निलेश पांडे यांच्या बदली नंतर सदर तक्रार निवारण केंद्र बंद झाले.पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांच्या आदेशानुसार काल डीसीपी अश्विनी पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत पोलीस ठाण्यात तक्रार निवारण केंद्र राबविण्यात आले त्यानुसार दर बुधवारचे तक्रार निवारण केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठीच्या वतीने करण्यात आले आहे.
कामठी शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता दर बुधवारी राबविण्यात येणाऱ्या तक्रार निवारण केंद्रामार्फत एसीपी निलेश पांडे यांनी समुपदेशनातुन कित्येक तक्रारी प्रकरणे मार्गी लावले. तक्रारी प्रकरणात कुण्या फिर्यादीचे समाधान न झाल्यास त्याचे निराकरण करीत न्याय द्यायचे परंतु एसीपी निलेश पांडे यांच्या 28 सप्टेंबर 2016 ला झालेल्या बदली नंतर प्रभारी एसीपी रमेश तायवाडे यांनी पदभार सांभाळला. 17 डिसेंबर 2016ला एसीपी अनिल मडावी यांनी पदभार घेत नाही तोच त्यांनी 25 मे 2017 ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर 24 सप्टेंबर 2017पर्यंत पुनश्च एसीपी रमेश तायवाडे यांनी पदभार स्वीकारला.तर 25 सप्टेंबर 2017 ला एसीपी राजेश परदेशी व तदनंतर एसीपी राजरत्न बन्सोड, आदींनी एसीपी पदाचा पदभार स्वीकारला परंतु एकाही अधिकाऱ्यांनी बंद असलेले तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.तेव्हा नागरिक व पोलीस यांच्यातील संबंध वृद्धिंगत होत पोलीस विभागातील विश्वास वाढावा याकरिता दर बुधवारी राबविण्यात येणारे तक्रार निवारन केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने संयोजक राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, उदास बन्सोड, नागसेन सुखदेवें, सुभाष सोमकुवर, गीतेश सुखदेवें, विकास रंगारी, सुमित गेडाम, आशिष मेश्राम, मनोज रंगारी, मंगेश खांडेकर, कोमल लेंढारे, राजन मेश्राम, रायभान गजभिये,कृष्णा पटेल,सलमान अब्बास,सलीम अब्बास यांनी केले आहे.
– पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडून अपेक्षा
– नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र पाच चे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या कार्यप्रणाली नुसार नागरिक व पोलीस यांच्यात सुसंवाद असावा, कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात .विविध समुपदेशनातून नागरिकांचा विश्वास संपादन संपादित करण्यास प्रयत्नशील आहेत.मात्र त्यांच्याच कार्यक्षेत्रातील नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दर बुधवारी राबविले जाणारे तक्रार निवारण केंद्र मागील सात वर्षांपासून थंडबसत्यात असल्याने हे तक्रार निवारण केंद्र सुरू होण्याची डीसीपी निकेतन कदम यांच्याकडूनच येथील नागरिकांना अपेक्षा आहेत.