गडचिरोलीला मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे नियोजन करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे रोलमॉडेल बनविण्याच्या दिशेने शासनाने ठोस पावले उचलली असून, स्थानिक गरजांची पूर्तता व शाश्वत विकासाच्या उद्देशाने सुसंगत व गुणवत्तापूर्ण नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना व खनिकर्म निधीतून होणाऱ्या खर्चाचा आढावा राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आज नियोजनभवन येथे घेतला. यात जिल्ह्याचा एकंदरीत विकास आराखडा कसा करता येईल आणि नाविण्यपूर्ण योजना कशाप्रकारे राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.

सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी जिल्ह्याच्या एकंदर विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची गरज व्यक्त केली. रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांवर भर देऊन स्थानिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मिशन मोडवर काम करण्याचे आणि केवळ खर्च करण्याऐवजी नियोजनपूर्वक विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील खानबाधित क्षेत्रातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खनिकर्म निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा, अशी सूचना जयस्वाल यांनी दिली. जिल्हा विकासासाठी निधीची अडचण नसून योग्य नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील विविध गरजा ओळखून त्या पुरवठ्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी डिस्ट्रीक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करण्याचा आग्रह धरत, सॅच्युरेशन मोडमध्ये जाऊन विविध विभागांची उद्दिष्टे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि मानव विकास यांसारख्या विभागांचा आढावा घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करणे, अतिक्रमण होऊ शकणाऱ्या जागांवर संरक्षण भिंती बांधणे आणि भौगोलिक क्षेत्रानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रोजगारातून महिलांचे व युवकांचे सक्षमिकरण या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे वार्षिक योजना आराखड्याची माहिती दिली. 641 कोटी रुपयांच्या मंजूर आराखड्यातून 265 कोटी 45 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी 216 कोटी 39 लाख रुपये विविध यंत्रणांना वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

Mon Jan 27 , 2025
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त आहे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अती दुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अडी अडचणींना तोंड द्यावे लागते या सगळ्या गोष्टीवर मात करून मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देणारे तसेच आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!