नागपूर3 : पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान योजना सन 2021-22 या वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायीक, स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी जोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेवू शकतात.
योजनेंतर्गत शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर, फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालन–50 लक्ष रुपये, कुक्कुट पालन – 25 लक्ष रुपये, वराह पालन –30 लक्ष रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकासासाठी 50 लक्ष रुपये इतकी आहे. प्रकल्पासाठी स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे.
योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, विज देयकाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमीनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी आदी उपलब्ध असल्यास सादर करावे.
सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ http://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.