नागपूर : जेथे जननीची पुजा होते ती महानभूमी आहे. जननी ही महान आहे. जन्माला आल्याबरोबर वडीलांचा आश्रय, लग्नानंतर पतीचा आश्रय, म्हातारपणी मुलांचा आश्रय. लग्न झाल्यावर त्या घरुन अर्थीच निघावी असे संस्कार आपल्या मनावर रुजवल्या गेले. स्त्रियांना सर्व अधिकारापासून वंचीत ठेवल्या गेले. सावित्रीबाई फुले यांनी सर्व स्थिती बदलविली व शिक्षणासारखे सर्वात मोठे धन स्त्रियांना दिले. या 100 वर्षात महिलांनी दाखवून दिले की, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान यासारख्या सर्वोच्च पदावर जावून राज्य करु शकतात. हे सर्व शक्य झाले ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे असे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य आयोजित संवाद कार्यक्रमात बोलतांना म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाने सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्या बायकांना शिक्षण देण्यासाठी त्या धडपडत होत्या त्यांनीच त्यांच्यावर शेणचिखलाचा मारा करुन त्यांना विरोध केला परंतु त्या डगमगल्या नाहीत किंवा घाबरल्या नाहीत व त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात येते. आपल्याला चांगले काम करायचे असेल व त्याला विरोध करणारे असतील तर घाबरुन जावू नका, धैर्याने ते काम करा, कोणी सोबत नसेल तर एकटेच चला, आपण यशस्वी नक्कीच होवू असेही त्यांनी सांगितले. राणी एलिझाबेथ, राणी विक्टोरीया, इंदिरा गांधी यांचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक डॉ.प्रियंका नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. बाई ही केवळ शिक्षण देते तर माई ही संगोपन करते, सुसंस्कृत करते, आपल्याला शिकवीते व स्वाभिमानी बनविते हे सर्व कार्य सावित्रीमाईंनी केले त्यामुळे त्या सर्व स्त्रियांसाठी वंदनीय आहेत आपण सर्वच त्यांचे ऋणी आहोत. त्यांचे सर्व कार्य प्रत्येक महिलांनी वाचले पाहिजे असे यावेळी त्या भाषणात म्हणाल्या.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी सावित्रीबाई फुलेंनी सर्व महिलांना शिक्षीत करण्यासाठी कशाप्रकारे आपले संपूर्ण आयुष्य वेचले याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तृतीयपंथी यांना आयुक्ताच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेन्द्र पवार, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, आशा कवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आडे तर आभार प्रदर्शन सुरेन्द्र पवार यांनी केले.