नागपूर :- शिवसेना पक्षाच्या विचारांशी तडजोड करून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा आणि पक्ष सांभाळू न शकण्याचा कंलक उद्धव ठाकरे यांच्या माथ्यावर लागला असून तो कसा पुसणार? असा प्रश्न रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केला. भाजपाच्या नेत्यांना व नागपूरला कंलक असे विधान करून ठाकरे यांनी त्यांच्या विचारांची पातळी दाखविली आहे, अशी खरमरित टीकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक असल्याचे विधान केल्यावर नागपूरकर व शिवसेनेचा सहकारी पक्ष म्हणून खा. तुमाने यांनी भूमिका मांडली. खासदार तुमाने म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा शिवसेना पक्षाचे विचार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांजवळ गहाण ठेवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री असताना शिवसेना आमदार, खासदारांची कामे होत नव्हती, पक्षाला बळकटी देण्यापेक्षा ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची भलाई होईल अशी कृती केली. यामुळे पक्षाचे आमदार व खासदार नाराज झाले व फारकत घेतली, हा कलंक ठाकरे यांना कधीच पुसता येणार नाही. भाजपाने शिवसेनेप्रती मोठे मन करून मुख्यमंत्री पद दिले, देवेंद्र फडणवीस यांनी केलला त्याग मोठा आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखविण्याऐवजी त्यांना कलंक म्हणून हिनविले यापेक्षा दु:खद काहीच नाही. यावरून उद्धव ठाकरे यांच्या विचारांची पातळी किती खालावली आहे, हे दिसून येते असेही ते म्हणाले.
राज्यासह नागपूरच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका आहे. नागपूरकर म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिमान आहे तर एक कर्तृत्वान नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचे भूषण आहे, असेही खासदार तुमाने म्हणाले.