एपिडा आणि अॅग्रो व्हिजनच्या चर्चासत्राचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
नागपूर :- शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी कृषी करावयाची असल्यास गावातील शेतक-यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले.अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत कृषी आणि प्रक्रीयायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण- एपिडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सेंटर पाईंट हॉटेल येथे ‘विदर्भातील फळे व भाजीपाला तसेच कृषी उत्पादनात निर्यातीची संधी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन करतांना नितीन गडकरी बोलत होते. याप्रसंगी एपिडाचे संचालक डॉ. तरुण बजाज, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, अॅग्रो व्हिजनचे सल्लागार डॉ. सी. डी. मायी, अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर, एपिडाचे विभागीय प्रबंधक नागपाल लोहकरे, प्रगतीशील शेतकरी आनंदराव राऊत, रमेश मानकर व प्रशांत कुकडे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात नव्याने येणारे तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातून शेतक-यांनी रचलेल्या यशोगाथा तयार करुन त्या इतर शेतक-यांपर्यंत जाणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी आपले उत्पादन आवश्यक तेवढे सक्षम नाही, याचा विचार करुन त्यात तंत्रज्ञान वापरुन निर्यातक्षम करावे लागेल, त्यासाठी पैसा अधिक लागणार आहे, यासाठी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पादक कंपन्या उभाराव्या व त्यामाध्यमातून एकत्रितपणे हे सर्व करणे शक्य होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.
उत्पादनखर्च कमी करुन उत्पादनात वाढ करणे सध्या काळाची गरज आहे. स्वस्त निर्यातीसाठी ड्रायपोर्टवरुन थेट बांगलादेश येथे निर्यातीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे, यासोबतच शेतक-यांनी देखील अधिक स्मार्ट होत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
नवोदित कृषी विद्यार्थ्यांना निर्यातीसाठी आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करावा, असे अॅग्रो व्हिजनचे डॉ. सी. डी. मायी यांनी सांगितले. आनंदराव राऊत यांनी, कृषी क्षेत्रातील यशोगाथांची माहिती देत, निर्यातक्षम दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करण्याचे आवाहन केले. रवींद्र ठाकरे यांनी, निर्यातक्षमता वाढविण्यासाठी एपिडाचे एक केंद्र नागपुरात असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. तरुण बजाज यांनी, शेतक-यांनी निर्यात करताना खरेदीदार देशाच्या मागणीनुसार दर्जेदार उत्पादक करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश गुळगुळे यांनी तर आभारप्रदर्शन रवींद्र बोरटकर यांनी केले. या कार्यक्रमास एपेडाचे अधिकारी, अॅग्रो व्हिजनचे पदाधिकारी , निर्यातदार तसेच शेतकरी उपस्थित होते.