मुंबई :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या बाजार समितीमधील गैरकारभार प्रकरणी शासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
पणन मंत्री रावल यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सन 2019 मध्ये निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. या संचालक मंडळापैकी काही सदस्य अपात्र ठरत असल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या संचालकाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे या संचालकांनी बैठकीत सहभाग घेतला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संचालक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊ शकत नाही, असे पणन मंत्री रावल यांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरकारभाराबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.