– लोणी येथे वैरण विकासची पाहणी
यवतमाळ :- पशुधनासाठी गावातच चांगल्या दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी गायरान जमिनीवर वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात पशुपालनास चालना मिळेल, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले.
बदलते वातावरण तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनास मुबलक चारा मिळावा तसेच चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान ई-क्लास जमिनीवर शासनाच्यावतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. कार्यक्रमांतर्गत आर्णी तालुक्यातील लोणी येथे कुरण क्षेत्रावर गवताचे थोंबे लागवड करण्यात आले आहे. मिशनचे अध्यक्ष अँड.हेलोंडे पाटील यांनी या क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शासनाच्या ई-क्लास गायरान जमिनीवर पशुपालनाकरिता उत्कृष्ट, सकस वैरण उत्पादन करुन पशुपालनास चालना देण्याचा शासनाचा मानस आहे. पशुआरोग्याकरिता उत्तम चारा, वैरण अतिआवश्यक आहे. चारा टंचाई व सकस चाऱ्याच्या कमतरतेमुळे पशुपालकांचा पशुपालनावरील भर कमी होताना दिसत असल्याने वैरण विकास धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
वैरण विकासाकरिता शासन आदेशानुसार सकस वैरण निर्मिती गावपातळीवरच करण्याचा उपक्रम राबविण्यात येत याहे. आर्णी तालुक्यात लोणी येथे मनरेगा, पशुसंवर्धन विभाग, कृषी व वन विभाग यांच्या संयुक्त समन्वयात गायरान ५ हेक्टर क्षेत्रावर वैरण लागवड करण्यात आली. अँड.हेलोंडे पाटील यांनी या क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, पशुधन विकास अधिकारी डॉ.अरुण आडे, वैरण विकास कार्यक्रमात महत्वपूर्ण सहभाग असलेले लोणीचे सरपंच अमोल वारंगे, ग्रामपंचायत सदस्य, पशुपालक, ग्रामस्थ, रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध ग्रामोपयोगी, शेतीविषयक विषयांवर शेतकऱ्यांशी चर्चा झाली.