मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. त्यामुळे या इराणी वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य अनिल परब यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
अनेक वर्षांपासून आंबिवली येथे इराणी वस्ती असल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले की, एखाद्या आरोपीवर कारवाईसाठी पोलीस या वस्तीमध्ये गेले असता त्याठिकाणी महिला समोर येऊन पोलीसांवर हल्ले करतात. याठिकाणी अनेक सराईत गुन्हेगार लपतात. तसेच या वस्तीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे देखील आहेत. या बांधकामांवरही कारवाई करण्यात येणार आहे. या वस्तीमध्ये आश्रय घेणाऱ्या गुन्हेगारांवर आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच अनेकवेळा गुन्हेगार हे पडीक इमारती, वापरात नसलेल्या इमारतींचा आश्रय घेत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अशा बांधकामांवरही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांवर कारवाईसाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली.